३५ वर्षांपूर्वी गव्हे गावाच्या डोंगराळ भागात अरविंद अमृते यांनी १० एकर जागा घेतली. या जागेत नर्सरी व्यवसाय करायची इच्छा त्यांनी मनात बागळली होती. एक तर डोंगराळ भाग त्यात पाण्याची वानवा यामुळं नर्सरी करण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळं त्यांना नर्सरी सुरू करता येत नव्हती. नर्सरी करण्यासाठी पाण्याचं आवश्यकता जाणून त्यासाठी त्यांनी पहिला पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी उपाय करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी पहिल्या प्रथम या ठिकाणी बोरींग उभारली. पण २०० फूट इतक्या खोलवर असलेली बोरही पाण्याचा स्रोत निर्माण करू शकली नाही. शेवटी त्यांना परिसरातल्या शेजाऱ्यांच्या मेहेरनजरवर काही वर्षांसाठी पाणी उपलब्ध झालं आणि त्यांनी आपल्या व्यवसायास सुरुवात केली.
मृत झरे झाले जिवंत
आलेल्या अडचणींमुळं अमृते स्वस्थ राहिले नाहीत. आपण पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंच पाहिजे, अशी जिद्द त्यांनी मनाशी बाळगली होती. यासाठी त्यांनी त्या डोंगरावर प्लगिंग, टेरेसिंग, सीसीटी इत्यादी जलव्यवस्थापनाचे प्रकार सुरू केले. शेवटी कष्टाला फळ मिळतंच याचा प्रत्यय त्यांनाही आला. 26 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ज्या डोंगरात एक थेंबभर पाणी मिळणंही दुरापास्त झालं होतं तिथले दगड पाझरू लागले. मृत झालेले झरे पुन्हा जिवंत झाले होते. त्याच जागेत पाच फुटांवर तीन झरे जिवंत झाले.
परिसरातलं आकर्षण
अमृतेंच्या अथक परिश्रमाला आलेलं फळ पाहण्यासाठी... मृत दगडांमध्ये लागलेले पाण्याचे झरे पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक आवर्जून येऊ लागले. या ठिकाणी पाणी लागणं म्हणजे इथं भेट देणाऱ्या लोकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. "मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड केल्यानं जमिनीअंतर्गत असलेले झरे जिवंत झाले. अशा तऱ्हेने तीन झरे वाहू लागले. तुम्ही निसर्गाला समजून घेऊन काम केलंत तर निसर्गही भरभरून देतो,” असं अमृते 'भारत4इंडिया'शी बोलताना म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अरविंद अमृतेंची नर्सरी विविध रोपांसाठी आणि कलमांसाठी आज प्रसिद्ध आहे. त्यांच्या नर्सरीत तयार केलेल्या रोपांना भरपूर मागणी आहे. हे साध्य झालं केवळ आणि केवळ कष्टाच्या जीवावर, असं अमृते अण्णा सांगतात.
नर्सरी व्यवसायासोबतच अॅग्रो टूरिझमही
नर्सरी व्यवसाय सुरू असताना त्यांनी याच जागेत अॅग्रो टूरिझमही सुरू केलं आहे. ट्री हाऊस, बांबू हट्स इथं पाहायला मिळतात. टूरिझमची जबाबदारी त्यांचा मुलगा आशीष सांभाळतो. तर त्यांची पत्नी शैला अमृतेही यशस्वी उद्योजिका म्हणून कोकणात प्रसिद्ध आहे. त्यांनी तयार केलेले विविध0पदार्थ मग ते मसाले असोत, कोकम सरबत असो किंवा फणस वेफर्स... मुंबई, पुण्यासारख्या शहरात भाव खाऊन जातात. या उत्पादनांनाही चांगली मागणी आहे.
प्रेरणादायी कार्य
एकेकाळी पाणी नाही म्हणून खचून न जाता योग्य जलव्यवस्थापनाच्या मदतीनं त्यांनी पाण्याचा स्रोत निर्माण केलाच, याशिवाय त्यांनी नर्सरी व्यवसायासोबतच इतर अनेक व्यवसायही यशस्वी करून दाखवले. त्यांच्या या कार्यामुळं आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना एक प्रकारे प्रेरणाच मिळत आहे.
Comments (1)
-
प्रिय मुश्ताक़भाई,
सलाम. आण्णासाहेब तर सुपर आहेतच. Hats ऑफ.
Great video. Great work.
congrats to you for covering this issue.
warm regards
तुषार